धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर- मुंबई, नांदेड- पनवेल या रेल्वे गाडयांना कळंब रोड येथे थांबा देण्यासह सोलापूर- तुळजापुर- धाराशिव रेल्वे मार्गाकरीता जमीनीचे भुसंपादन 80 टक्के पुर्ण करुनच रेल्वे मार्गाची निविदा काढण्यात यावी अशा मागण्या खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर यांनी लोकसभेत केली.

धाराशिव -तुळजापूर - सोलापूर या रेल्वे मार्गाकरीता संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा आकांक्षीत जिल्हा म्हणून थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे शेतकऱ्यांना द्यावा.  या रेल्वे मार्गाचे भुसंपादन 80 टक्के पुर्ण झालेले नसतानाही रेल्वे मार्गाचे टेंडर काढण्याच्या हालचाली सुरु असल्याची बाब खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  निदर्शनास आणुन दिली.

कोरोना महामारीमध्ये जेष्ठ नागरीक, दिव्यांग, पत्रकार यांसाठी असणाऱ्या रेल्वेच्या सवलती पुर्ववत सुरु कराव्यात, लातूर- मुंबई, बिदर- मुंबई रेल्वे गाडयांना अतिरिक्त जनरल डब्बे जोडावेत,या दोन्ही गाडयांमध्ये मोठया प्रमाणात प्रवाश्यांची ये जा सुरु असते त्यामुळे  रेल्वे गाडयांचे जनरल डब्‌‍बे ओव्हर क्राऊड असतात. त्यामुळे धाराशिव व बार्शी स्थानकावरुन जनरल बोगीने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना जागा मिळत नाही. दोन्ही गाडयांना जनरल बोगीची संख्या वाढवण्यात यावी अशा मागण्या खासदार राजेनिंबाळकर यांनी यावेळी केल्या.

लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीचे दोन वेळा निवडणुका तोंडावर आल्यानंतर उद्घाटन करण्यात आले. अनेक वर्षाचा कालावधी जावूनही रेल्वे कोच फॅक्टरीमधून अद्याप उत्पादन सुरु नसल्याचे सांगून सरकारला धारेवर धरले. रेल्वे विभागाकडून रेल्वे मार्गाचे बांधकाम करत असताना शेतकऱ्यांच्या वहिवाटीतील रस्ते बंद करुन रेल्वे मार्गावरती युबी,ओबी अशा रस्त्यांची निर्मीती केली जाते परंतू हे रस्ते दर्जाहीन असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. जिल्हयातील रेल्वे संबंधीच्या समस्यांवर बोलत असताना धाराशिव रेल्वे स्थानकावरील रॅक पॉइंन्ट येथे निवारा शेड नसल्याने रेल्वेने आलेली खते,अन्नधान्याची पावसाळयात मोठया प्रमाणात नासाडी होते. रॅक पॉइंन्ट येथे निवारा उभा करण्याकडेही खासदार ओमराजे यांनी रेल्वे मंत्री यांचे लक्ष वेधले.

 
Top