भूम (प्रतिनिधी)- भूम शहरासह वाशी, हिवरा, हाडोग्री, वंजारवाडी या गावांना होणाऱ्या आरसोली (वंजारवाडी) मध्यम प्रकल्पाच्या आवारात चांगला पाऊस पडल्याने आरसोली मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून या गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

भूम वाशी शहरासह इतर तीन गावांना मिळून याच प्रकल्पामधून पाणी पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. सध्या भूम शहराला तीन दिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. आरसोली मध्यम प्रकल्प 100% भरल्यामुळे लवकरात लवकर भूम शहराला दोन दिवसा आड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये  प्रकल्प 100% भरल्यामुळे दोन शहरासह तीन गावांचा वर्षभराचा पाणी पिण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच वंजारवाडी, आरसोली, सावरगाव या गावांना कालव्याद्वारे पाणी सोडल्याने रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे. तसेच एकूण 700 हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आरसोली मध्यम प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी होता. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नव्हते व कृषी पंपाचे वीज कनेक्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले नव्हते. मात्र यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 
Top