धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा व महिला, शेतकरी, तरुण यांसह सर्व समाज घटकातील सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करणारा अर्थसंकल्प असून त्याचे आम्ही हार्दिक स्वागत करतो असे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण ' योजनेतून 2.5 कोटी महिलांना महिन्याला रू. 1500 देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील माता-भगिनींना या आधारासह सक्षम करण्यासाठी 25 लक्ष महिलांना लखपती दीदी करण्याचं देखील उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी सह सर्व प्रकारच्या व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज, सोयाबीनसह कापूस उत्पादकांना हेक्टरी रू.5 हजार अनुदान देण्यात येणार आहे. त्याबरोबरच मागेल त्याला सौर पंप, गायीच्या दूधाला रू. 5 प्रती लिटरल अनुदान, कृषी पंपाची थकीत बिले माफ व शेतकऱ्यांचा शेतमाल साठवण्यासाठी गाव तिथे गोदाम योजना, अटल बांबू योजनेतून शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी बांबू रोपे व अनुदान देण्यात येणार आहे सारख्या योजना जाहीर केल्याने महायुतीचे सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची बाब अधोरेखित होते.

वर्षभरात 10 लाख तरुणांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी दर महिना रू. 10 हजार विद्यावेतन व कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कर सवलत या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे. वारकरी संप्रदाय वारकरी परंपरा ही महाराष्ट्राची ओळख आहे लाखो वारकरी दिंडीच्या माध्यमातून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला पायी चालत जातात. त्या वारकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापना करणार आहे. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीची सुविधा देऊन वारीला जागतिक वारसा नामांकन मिळवून देण्यासाठी काम करणार  व दिंड्यांना वीस हजार रुपये प्रति दिंडी महायुतीचे सरकार देणार आहे.

त्याबरोबरच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून पात्र कुटुंबाला दरवर्षी 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेऊन महायुतीचे शासन महिला, शेतकरी, युवक व गोरगरिबांच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याचे सिद्ध होते. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नाची स्वप्नपूर्ती होणार असल्याचेही यावेळी श्री. नितीन काळे यांनी म्हटले आहे.


 
Top