धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभा निरीक्षक श्री.विजय चौधरी यांनी दिली. धाराशिव लोकसभा मतदारसंघात झालेल्या महायुतीच्या पराभवाची कारणमीमांसा करुन आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अनिल काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.व्यंकटराव गुंड, ॲड.अनिल काळे, ॲड.खंडेराव चौरे, डॉ.गोविंद कोकाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, डॉ.गोविंद कोकाटे, ॲड.नितीन भोसले, इंद्रजित देवकते, प्रवीण पाठक, विकास कुलकर्णी, प्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सिंचन, रस्ते, आरोग्य आणि इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यानी आढावा बैठकीत दिलेल्या आहेत. देशात आणि महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे त्याबाबतही तात्काळ कार्यवाही करुन हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.


नाना पटोलेंचा निषेध

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याकडून स्वतःचे पाय धुवून घेतल्याचे वृत्त अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अथवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एखादी महिला आल्यास तिच्या पाया पडून दर्शन घेतात. मात्र काँग्रेसचे नेते मात्र कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात. ही लाजिरवाणी बाब असून काँग्रेसला सत्तेचा माज चढल्याचे यावरुन दिसत आहे. पुढे कदाचित यांची सत्ता आल्यानंतर ते जनतेकडूनही पाय धुवून घेतील. म्हणून आपण या घटनेचा निषेध करत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.


जातीय तेढ महाराष्ट्राला शोभणारी नाही

महाराष्ट्र राज्यात सध्या जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काहीजण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहु महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संत-महंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला ही बाब शोभणारी नाही. देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या या राज्यातील जनतेने यावरुन बोध घेण्याची गरज चौधरी यांनी व्यक्त केली.


 
Top