कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकातील तिसरा डोळा समजले जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत असल्याने चोऱ्या, हाणामाऱ्याचा तपास लागत नसल्याने पोलिसासह प्रशासन हैराण झाले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गांभीर्याने घेऊन कॅमेऱ्याची संख्या वाढवून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
कळंब बस स्थानकावर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व उन्हाळी सुट्टी चालू असल्यामुळे प्रवाशांची तोबा गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोऱ्या, सोने चांदीचे दागिने लंपास, हाणामाऱ्या अशा अनेक घटना या सातत्याने घडत आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांना तिसऱ्या डोळ्याची मदत घ्यावी लागते. तिसरा डोळाच हा बंद अवस्थेत असल्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावाच लागत नसल्यामुळे प्रशासन हैराण झाले आहेत. बस स्थानकात एकूण चार कॅमेरे आहेत. बस स्थानकाचा परिसर फार मोठा असल्यामुळे यात कॅमेऱ्याची संख्या वाढवावी लागते असेही अनेक वेळा पोलीस प्रशासनाने महामंडख प्रशासनाला सांगितले आहे. परंतु याकडे अद्याप प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे चोऱ्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तातडी लक्ष घालून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवून, बंद अवस्थेत असलेले कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.
आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पत्राद्वारे या कॅमेऱ्याबाबत वेळोवेळी माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे कॅमेरेची संख्या वाढवण्याची विनंती केली आहे व दुरुस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे - बालाजी मुळे (सहाय्यक वाहतूक अधीक्षक)