उमरगा (प्रतिनिधी)-भारतीय संस्कृतीत विविध जाती, धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत. त्याचा स्वाभिमान जपला पाहिजे. परंतु न्याय मंदिरात पवित्र अशा भारतीय संविधान ग्रंथाचे अवलोकन करुन त्या पद्धतीने काम केल्यास मिळणारे आत्मिक समाधान विशेष असे असते. तरुण वकिल मंडळींनी इतिहासाविषयी सजग असले पाहिजे. कायद्याच्या पुस्तकाबरोबरच विविध पुस्तकांचे मित्र होऊन सामाजिक दृष्टिकोन जागृत ठेवावा असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.

उमरगा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन 27 एप्रिल 2024 रोजी न्यायमुर्ती  वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अरूण  पेडणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रविंद्र घुगे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. के.अनभुले, महाराष्ट्र व गोवा बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अँड. मिलींद पाटील, उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड. जी.के. गायकवाड यांची उपस्थिती होती.

न्यायमुर्ती वराळे बोलताना म्हणाले की,  व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान समजण्याचा भ्रम झाला आहे. पण माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. ज्ञान संपादन करावे लागते. 

यावेळी न्या.पेडणेकर, न्या.घुगे, अँड. मिलींद पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. अक्षय तोतला, सचिव ॲड. प्रवीण पाटील, सहसचिव ॲड.वर्षा जाधव, कोषाध्यक्ष ॲड. दादाराव कातपुरे, ॲड. एम. डी. गायकवाड, ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. अरूण सुर्यवंशी, ॲड. संदिप देशपांडे, ॲड. प्रविण तोतला, ॲड. एस. पी. इनामदार, ॲड. अमित सांगवे, ॲड. शिल्पा सुरवसे यांची उपस्थिती होती.

उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. जी. के. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शेंडे यांनी स्वागतपर भाषण केले. संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांचे आभार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. डी. के. अनभुले यांनी मानले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वोच्च पदापर्यंत पोहचलो !

विषमतेचे साखळदंड तोडून समानतेचा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वोच्च पदापर्यंत पोहचलो अशी भावना न्यायमुर्ती श्री. वराळे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी श्री. छत्रपती शिवराय, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास यांच्या सामाजिक कर्तृत्वाची महती सांगितली. त्यांचा आदर्श सामाजिक परिवर्तनासाठी महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.


भारतीय संविधानाचा दिमाखदार पालखी सोहळा

जिल्हा न्यायालयाची देखणी इमारत उमरगा शहराच्या वैभवात भर टाकणारी आहे. यावेळी येथील विधीज्ञ मंडळाच्या सदस्यांनी नुतन इमारतीतून व्यासपीठापर्यंत टाळ मृदंगाच्या निनादात, छत्रपती शिवरायाचे मावळ्यांच्या वेशभूषेत भारतीय संविधानाचा लक्षवेधक पालखी सोहळा काढण्यात आला. हे दृश्य पाहून व्यासपीठावरून न्यायमुर्ती श्री. वराळे यांनी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीला खांदा दिला.


 
Top