धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांनी शेतकरी, विद्यार्थी आणि गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले. मराठा आरक्षणासाठी रान पेटवून शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले. यापुढे नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली छावा पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हमीभाव, विद्यार्थी तसेच गोरगरीबांच्या अडचणी सोडविण्यासाठी छावा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी केले.
शहरातील समर्थ हॉलमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेची जिल्हा आढावा बैठक शुक्रवारी (दि.22) घैण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके, जालना जिल्हाध्यक्ष राधेश्याम पोवळ, सोशल मीडिया जिल्हाउपध्यक्ष नानासाहेब गुंड, महिला तालुकाध्यक्ष आशा दत्तात्रय सुरवसे, भूम तालुकाध्यक्ष कल्याण हुंबे , जिल्हा संघटक अमोल गोरे , छावा सचिव ज्योतीराम काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष काळे पाटील म्हणाले की, जो सोबत येईल त्याला सोबत घेऊन, जो सोडून जाईल त्याला सोडून देऊन आणि जो आडवा येईल त्याला आडवा करुन पुढे जायचे असे अशा विचारांनी अण्णासाहेब जावळे पाटील यांनी संघटना बळकट केली. यापुढील काळात याच विचाराने संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदार आपल्यावर आहे. सर्व जातीधर्माला सोबत घेऊन कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.
बैठकीत पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यात धाराशिव शहराध्यक्षपदी प्रशांत पवार, शहर उपाध्यक्ष अमोल मोरे, धाराशिव युवक अध्यक्ष बालाजी होबळे, धाराशिव तालुका संघटक बालाजी पवार, विद्यार्थी युवक तालुका अध्यक्ष विजयकुमार दत्तात्रय मुळे, युवक अध्यक्ष (ग्रामीण) अजय लोंढे, युवक उपाध्यक्ष विक्रम कदम, तालुका संघटक (ग्रामीण) सचिन जमादार यांची निवड करण्यात आली. भूम तालुक्यासाठी अजित नवनाथ हुंबे पदी विद्यार्थी तालुका अध्यक्ष, संदीप भगत यांची भूम वाहतूक तालुका आघाडी अध्यक्ष, मल्हारी नवनाथ सावंत यांची भूम तालुका संघटक पदी आणि इतर यांची निवड करण्यात आली.या बैठकीत अण्णासाहेब जावळे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भूम येथील 25 कार्यकर्त्यांनी छावा संघटनेत प्रवेश केला. बैठकीस धाराशिव जिल्ह्यातील छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.