धाराशिव (प्रतिनिधी)-यंदाच्या दुष्काळामुळे मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई होत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीला देखील पाणी उपलब्ध नाही. मराठवाड्यामध्ये धरणे व तलावांची संख्या फार कमी आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये शेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा अनुशेष फार मोठा आहे. अशावेळी उपलब्ध असलेल्या विहिरीतूनच शेतीसाठी व इतर वापरासाठी पाण्याची गरज भागविली जाते, परंतु यापैकी बहुतांश विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने पाण्याचा स्त्रोत कमी झाला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची विहीर कोरडी असली तरी आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने या विहिरीतील शेतकऱ्यांना गाळ काढता येऊ शकत नाही. सध्या या विहिरींना पाणी कमी असले तरी गाळ काढला गेल्यास, ज्या वेळेला पाऊस चांगला होईल त्यावेळी शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आणि अशा दुष्काळी परिस्थितीत किमान शेती सह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. शासन नवीन विहिरी खोदण्यासाठी अनुदान देते. नवीन विहीर खोदण्याच्या तुलनेने जुन्या विहिरीचा गाळ काढण्याचा खर्च कमी असतो आणि पाण्याचा स्त्रोत शाश्वत असतो. आपले शेती व माती विषयी प्रेम सर्वश्रुत आहे. शासनाने जुन्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी अनुदान द्यावे अथवा गाळ काढण्याची कामे रोजगार हमी योजनेचे माध्यमातून हाती घ्यावी अशी मागणी आपच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे,मुन्ना शेख जिल्हा सचिव, तानाजी पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष,श्रीकांत भुतेकर जिल्हा उपाध्यक्ष,राजपाल देशमुख तालुका अध्यक्ष,संजय दनाने तालुका सचिव,चांद शेख मीडिया प्रमुख, बिलाल रजवी शहराध्यक्ष,मुख्तार शेख संघटक,दत्ता कांबळे,शहाजी पवार,अंकुश चौगुले आदींसह आपचे पदाधिकारी उपस्थित होते.