धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन अत्यंत लाभदायक असते. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले. 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदान येथे  18 ते 22 जानेवारी या कालावधीत  महारष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री. तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. यावेळी ते बोलत होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, बिजमाता म्हणून प्रसिध्द असलेल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लातूर विभागाचे कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीष हरिदास, प्रगतशील शेतकरी त्र्यंबक फड व स्वातंत्र्य सेनानी बुबासाहेब जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की, धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा आहे. आपणास दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टीला सामोरे जावे लागते. निसर्गच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. धाराशिव जिल्ह्यास उजनी धरणातून 7 टिएमसी पाणी मिळावे म्हणून 11 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. शेतक-यांना मदत करण्याच्या भावनेतून मराठवाडा वॉटर ग्रिड योजना राबविली जात आहे. यावेळी प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले. याप्रंसगी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे आणि कृषी सहसंचालक दिवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार उपविभागीय कृषी अधिकारी यांनी मानले.


देश आर्थिक महासत्ता बनेल

यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, देशाचे अर्थकारणही शेतीवर अवलंबुन आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यास शेतकरी सक्षम आहेत. त्यासाठी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणेही आवशयक आहे. हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


रासायनिक शेतीमुळे अनेक रोग

बिजमाता राहीबाई पोपिरे म्हणाल्या,रासायनिक शेती व धान्य मानवी जीवनामध्ये आल्यापासून अनेक व्याधींनी माणसाला ग्रासले आहे. हे टाळण्यासाठी शेतक-यांनी जुने ते सोने याप्रमाणे आपल्याकडील बियाण्यांचा वापर करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा.नैसर्गिक शेतीवर हवामानानुसार पिकावर कोणताही विपरित परिणाम होत नसल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top