धाराशिव (प्रतिनिधी) - शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारांच्या माध्यमातून सक्षमपणे होत आहे. पत्रकार शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना सहजासहजी समजेल अशा भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रसार करण्यासह प्रसिद्धी देण्याचे काम करतात. त्यामुळे पत्रकार शासन व प्रशासनाने संघर्षाची भूमिका न घेता एकत्र येऊन समन्वयाने काम केल्यास शेवटच्या तळागाळातील वंचित व्यक्तींचा नक्कीच  सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दि.6 डिसेंबर रोजी केले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व दर्पण दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार व अधिकाऱ्यांचा सत्कार धाराशिव शहरातील सुनील प्लाझामधील संपर्क कार्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता जिल्हा शल्यचिकित्सक इस्माईल मुल्ला व्हाईस ऑफ मीडियाचे राज्यकार्यकारणी सदस्य सयाजी शेळके,जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ओंबासे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग, कारखाने व भांडवलदार नाहीत. त्यामुळे पुणे व मुंबई सारख्या  सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्यातील पत्रकार देखील केवळ ग्रामीण भागातील पीक विमा, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या बातम्यांना प्राधान्य देतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला देखील ते प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारिता व पत्रकारांची मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात केलेल्या सत्काराचा उद्देश सत्कारमूर्तींनी केलेल्या सकारात्मक कामाचा आदर्श इतरांसमोर ठेवण्यासह संबंधितांचे मनोबल वाढावे व त्यांना प्रोत्साहन देणे असल्याचे त्यांनी सांगितले. 

तर डॉ इस्माईल मुल्ला म्हणाले की, पूर्वीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता यामध्ये खूप फरक पडला आहे. पोलीस व आरोग्य खाते 24 तास कार्यरत असते. मात्र आज पत्रकार देखील 24 तास कार्यरत असतात. त्यामुळे पूर्वीचे आजार व आताचे आजार यामध्ये देखील मोठा फरक पडला आहे. पत्रकारांनी निगेटिव्ह पत्रकारिता करण्याऐवजी पॉझिटिव्ह पत्रकारिता करावी व पॉझिटिव्ह मन ठेवल्यास शरीर देखील निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असून कोणत्याही प्रकारचा ताणतणावाचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार होऊ नये यासाठी पत्रकारितीचे व्यवस्थापन करावे असे आवाहन त्यांनी केले. 

तसेच राहुल गुप्ता म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासकीय योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजनेची माहिती पत्रकार बातमीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवितात. त्यामुळे त्याचा लाभ संबंधितांना होण्यास मदत होते. तसेच पत्रकारांसाठी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत यासह इतर योजनांचा लाभ मिळावा यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार महादेव नरोटे, गणेश शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी, महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना शेख, एमपीएससी परिक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी घातलेले विठ्ठल तांबे, वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मुस्कान अल्ताफ सय्यद यांना शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुंकार बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन मल्लिकार्जुन सोनवणे यांनी व उपस्थितितांचे आभार अमजद सय्यद यांनी मानले. यावेळी साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, साप्ताहिक विंग उपाध्यक्ष जफर शेख, डिजिटल विंग जिल्हा उपाध्यक्ष सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, शिक्षण विंग जिल्हाध्यक्ष शीतल वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर माळी, विनोद बाकले, आयुब शेख, सतीश राठोड, आकाश नरोटे, हुकमत मुलाणी, सुभाष कदम, असिफ मुलाणी, विशाल जगदाळे, विश्वनाथ जगदाळे, प्रशांत सोनटक्के, प्रशांत मते, अमोल गायकवाड, सचिन वाघमारे, अरुण गंगावणे, रविराज मंजुळे, अल्ताफ शेख, कलीम मुसा सय्यद, राजेश बिराजदार, ज्योतीराम निमसे, सतीश मातने, ताजखाँ पठाण, रियाज शेख, सिकंदर पठाण, अली शेख , राजकुमार गंगावणे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top