धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा हा कायम अवर्षणग्रस्त असल्यामुळे हा जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण आपल्याकडे पाण्याचे शाश्वत स्त्रोत नसल्यामुळे उत्पन्नाचे खात्रीशीर कोणतेच साधन नाही. तर शिक्षण हाच एकमेव आपल्यासमोर पर्याय असून जास्तीत जास्त युवकांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी बनावे. पश्चिम महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या गावागावात फौजा निर्माण झालेले आहेत. त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील गावागावात अधिकाऱ्यांची फौज तयार व्हावी असे आवाहन आ. कैलास पाटील यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील झरेगाव येथील विठ्ठल विनायक तांबे या युवकाने वयाच्या 25 व्या वर्षी विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसनी घातली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार आ. कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड अक्षय देशपांडे, बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण संकपाळ, पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे, सोसायटी चेअरमन नागनाथ ढोकळे, विजय तांबे, पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे, प्रदीप तांबे, शिवसेना तालुकाप्रमुख सौदागर जगताप, माजी सरपंच अमोल मुळे, रावसाहेब तांबे, संजय संकपाळ, भाऊसाहेब तांबे, विकास सोनवणे, अरुण सारफळे व गणेश तांबे व योगेश ढोकळे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, मराठवाड्यात कुठलाही उद्योग व एमआयडीसी नाही. त्यामुळे या भागातील अनेक तरुण रोजगारासाठी पुणे, मुंबई व छत्रपती संभाजीनगर या भागात जातात. विशेष म्हणजे अनेक गावांमध्ये समाज मंदिर व सभागृह बांधण्याचा प्रत्येक गावचे नागरिक आग्रह धरतात व ते बांधकाम करून घेतात, मी या विरोधात नाही. परंतू समाज मंदिर व सभागृह बांधण्याऐवजी गावागावात अभ्यासिका बांधण्यासाठी आग्रह धरावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रमोद भोंग यांनी तर उपस्थित आमचे आभार विकास सोनवणे यांनी मानले. 


 
Top