भूम (प्रतिनिधी)- कृषी विभाग धाराशिव मार्फत प्रक्षेत्र भेट व मासिक चर्चासत्र तालुका भूम येथे आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राची सुरुवात मौजे हाडोंग्री येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पाटील यांच्या ध्यानकेंद्र येथून झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव रविंद्र माने तसेच एम. बी. पाटील, प्राचार्य कृषी महाविद्यालय धाराशिव यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मान्यवरांनी बाळासाहेब पाटील यांनी लागवड केलेल्या मोसंबी, संत्रा, आंबा इत्यादी फळबागांची पाहणी केली.
त्यानंतर आरसोली येथील मुंडेकर यांच्या कारले व कांदा लागवडीची आणि गोयकर यांच्या दुग्ध व्यवसायाची पाहणी केली. माणकेश्वर येथे श्रीराम चक्रे यांच्या सघन आंबा लागवड व द्राक्ष बागेची पाहणी करून त्यांच्या अडचणीवर पाटील यांनी उपाय योजना सुचवली. तद्नंतर सावरगाव येथील बोऱ्हाडे यांच्या आंबा फळबाग आणि शेततळे येथे भेट दिली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या भेटीदरम्यान पाटील यांनी टंचाई सदृश्य परिस्थितीमध्ये फळबाग जगण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी ठिबकद्वारे फळबागांना द्यावे. तसेच पालापाचोळा, गवत यांची आच्छादन झाडाच्या खोडाजवळ करावे. ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही व ओलावा टिकून राहील. आवश्यकता वाटल्यास केओलीनचा वापर करावा. सूर्यवंशी यांनी ज्वारी वरील लष्करी अळीच्या बाबतीत वाळू व चुना 9:1 प्रमाणात ज्वारीच्या पोग्यात जाईल या पद्धतीने विस्कटावा. 30 दिवसापेक्षा जास्त दिवसाच्या असेल तर इमामेक्टिन बेंझोएट या कीटकनाशकाची फवारणी घ्यावी असे सांगितले.
या मासिक चर्चासत्राच्या वेळी रवींद्र माने, एम. बी. पाटील, सूर्यवंशी, हरनाळीकर, शुक्राचार्य भोसले, महादेव आसलकर, संजय गायकवाड, बी. बी. जाधव, राजाराम बर्वे, पाटील, घुले, इतर कृषी विभाग कर्मचारी आणि शेतकरी आदी उपस्थित होते.