धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी खासदार ओमप्रकार राजेनिंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाचे बांधव जातीच्या आधारावर आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. जातीच्या आधारावर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आणि धनगर समाज गेल्या अनेक दिवसांपासून मूक मोर्चा, उपोषण आणि अनेक निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रात शांततेने आंदोलन करत आहेत. 1980 पासून मराठा समाज जातीच्या आधारावर आरक्षण मिळणेसाठी प्रयत्न करत असून महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव हे अनुसुचीत जमाती या प्रवर्गामध्ये (एस. टी) समाविष्ठ करणे बाबत आग्रही असून धनगर समाज बांधवाचे चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज हा भटक्या विमुक्त व अनुसुचीत जमाती मध्ये विभागला असून संपुर्ण धनगर समाजास अनुसुचीत जमाती या प्रवर्गामध्ये समाविष्ठ करणेसाठी प्रयत्नशिल आहे. तसेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे गेले अनेक दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण देणेसाठी उपोषणास बसले असून संपुर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठींबा आहे. दोन्ही समाजाच्या आरक्षणाची मागणी ही न्याय मागणी असून सदर समाजास आरक्षण देणे करीता संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व दोन्ही समाजाची न्याय मागणी पुर्ण करुन समाजास आरक्षण तात्काळ देणे बाबत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.