धाराशिव (प्रतिनिधी)- जमिनीचे वाद आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी सलोखा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी अशाप्रकारचे वाद वर्षानुवर्षे चालू आहे. शेतजमिन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे. या वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत आहे. अशा प्रकारचे वाद संपुष्ठात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.

हे वाद संपुष्ठात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकात सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणा-या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची “सलोखा योजना राबविण्यात येत आहे. तरी यांचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.



 
Top