धाराशिव (प्रतिनिधी) - मराठवाडातील मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभागी जनतेवर तत्कालीन जुलूमी निजाम राजवटीने अनेक अत्याचार केले. जालियनवाला बाग हत्याकांडासारखे अनेक हत्याकांड या भागात घडले आहेत. बहुसंख्य जनतेवर रजाकारांनी अत्याचार केला आहे. या लढ्याचा खरा इतिहास जनतेसमोर येणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते माधव भंडारी यांनी धाराशिव येथे सांस्कृतिक वार्तापत्राच्या “ लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा “ या विशेषांकाच्या प्रकाशन व मुक्ती संग्रामातील सहभागी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्या गौरव सोहळ्यात व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अँड. व्यंकटराव गुंड, सांस्कृतिक वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर या उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव संयोजन समितीच्यावतीने व सांस्कृतिक वार्तापत्राच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, बुवासाहेब जाधव, शेषराव बनसोडे यांचा शाल, श्रीफळ,  पुष्पहार व विशेष अंकाची प्रत देऊन वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात पुढे बोलताना माधव भंडारी म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे संपूर्ण स्वातंत्र्य नव्हते तर ते फाटके स्वातंत्र्य होते. कारण गोव्यामध्ये पोर्तुगीज पाँडिचेरीमध्ये फ्रेंच राजवट व मराठवाड्यामध्ये व तत्कालीन हैदराबाद स्टेट मध्ये निजाम राजवट होती. या राजवटीतील स्वातंत्र्य चळवळीसाठी झटणाऱ्या तत्कालीन स्वातंत्र्य सैनिकांना तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसने मदत न केल्याने त्या भागातील जनतेस उशिरा स्वातंत्र्य मिळाले.  तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर भूमिकेमुळे व भारतीय सैन्याने राबविलेल्या आँपरेशन पोलो मोहिमेमुळे स्थानिक जनतेच्या रेटयामुळे मराठवाडयास एक वर्ष एक एक महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले तर गोवा राज्य 14 वर्षानंतर व पाँडिचेरी राज्यास अठरा वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले. 

यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, सांस्कृतिक वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर, ॲड. व्यंकटराव गुंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज नळे यांनी केले. तर सूत्रसंचालन ॲड. महेंद्र देशमुख यांनी व आभार प्रदर्शन प्रशांत कावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल शेंडगे, संदीप इंगळे, राजाभाऊ कारंडे, सुजित साळुंके, गणेश इंगळगी, प्रमोद बचाटे, दासोपंत देशपांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह समाजातील विविध स्तरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

एमआयएम ने माफी मागावी

निजामाचा वारसा सांगणाऱ्या एमआयएम पक्षाने या अत्याचाराबद्दल मराठवाड्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे. कारण हिटलरने केलेल्या अत्याचाराची माफी जर्मनीने अनेक वेळेस जगासमोर मागितली आहे असे सांगून  मराठवाड्याच्या मागासलेपणा दूर करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत प्राध्यापक भंडारी यांनी व्यक्त केले. 




 
Top