धाराशिव (प्रतिनिधी)- विमुक्त जाती (अ) प्रवर्गात बोगस राजपूत भामटा, परदेशी, मीना, छप्परबंद, लोकांची होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी सरकारकडून नेमलेली एसआयटी चौकशी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याच्या निषेधार्थ धाराशिव येथे गोर सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.4) शिंदे-फडणवीस-पवार यांच्या प्रतिमेला जोडे हाणून आंदोलन केले. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करीत शिंदे-फडणवीस-पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत देण्यात आले. निवेदनात म्हटले की, मागील अनेक वर्षापासून विमुक्त जाती (अ) प्रवर्गामध्ये अवैधरीत्या व संवैधानिक मार्गाने जात वैधता प्रमाणपत्र मिळवणार्‍या बोगस राजपूत भामटा, परदेशी, मीना व छप्परबंद समाजाने फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी केलेली आहे. त्यामुळे मूळ विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील लोकांचे आरक्षण संपूर्णतः धोक्यात आलेले आहे. परिणामी विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. तसेच या प्रवर्गातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अन्याय सहन करावा लागत आहे.

ही समस्या सोडविण्यासाठी गोर सेनेच्या वतीने 2019 पासून वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने करण्यात आली. सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवला असताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यासाठी एसआयटी समितीची नेमणूक करण्याचे आश्वासन दिलेले असताना पुन्हा 3 ऑगस्ट रोजी चौकशी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे ही एसआयटी चौकशी कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या आंदोलनात गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, मोहन राठोड, नवनाथ आडेकर, राजाभाऊ राठोड, कालीदास चव्हाण, सचिन राठोड, सचिन पवार, कुमार राठोड, शहाजी चव्हाण, राजूदास आडे, रामदास आडे, किरण चव्हाण, शरद राठोड, शिवाजी चव्हाण यांच्यासह बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top