तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील अपसिंगा ए. जी. जाईन वरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा मागणीसाठी  निवेदन देवुनही त्याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण विभागीय  कार्यालयासमोर सोमवार दि. 10  जुलै रोजी  धरणे आंदोलन सुरु करताच दुरुस्ती कामे तात्काळ सुरु करून विद्युत पुरवठा सुरुळीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन  कार्यकारी अभियंता महावितरण तुळजापूर विभागीय कार्यालयाने दिले.

तुळजापूर तालु्नयातील अपसिंगा येथील ए. जी. असलेला विद्युत पुरवठा हा गेली काही महिन्यापासुन सातत्याने बंद केला जात आहे. सध्या मशागतीची कामे चालु असल्याने तसेच अनेक शेतकरी हे शेतामध्यच राहात असल्याने त्याचा नाहक त्रास शेतकर्‍यांना सोसावा लागत आहेत. तेसेच गेली काही दिवसापासुन सदर भागात चोर्‍याचेही प्रमाण वाढलेले आहे. 

तसेच सदर ए.जी. लाईनवर तुळजापूर येथील, पांडुरंग नगर, लक्ष्मी नगर हा भाग असुन सदर लाईन ही काही खाजगी गुत्तेदाराकडुन प्लॉटींग करतेवेळी तोडली गेली असुन तेथील लाईनचे काम हे व्यवस्थीत झालेले नाही. त्यामुळे थोडाही पाऊस पडल्यास अथवा वारा सुटल्यास आपसिंगा, कात्री, कामठा, तुळजापूर (खुर्द) या ठिकाणची लाईट ही बंद पडत आहे. त्यामुळे त्याचा त्रास शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. तरी याबाबत आपण तात्काळ उपाय योजना करुन सदर ए.जी. लाईन दुरुस्त करुन शेतकर्‍यांचा कायमचा प्रश्न सोडवावा अशी मागणी निवेदन दिले होते. तरीही त्याची दखल न घेतल्याने जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, धनाजी पेंदे, दुर्वास भोजणे, प्रदीप जगदाळे, विकास भोजने, निलेश बाळासाहेब शेरेखर, अदिनाथ काळे, रत्नेश गाटे, विकास मार्ड, अमर भोजने, वैजीनाथ ढेकरे, उमेश जमदाडे, मुकेश भोसलेसह शेतकरी धरणे आंदोलनास बसला असता आंदोलनस्थळी  विभागीय  महावितरण कार्यकारी अभियंता येवुन लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले.


 
Top