धाराशिव / प्रतिनिधी- 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास  2000 रुपये प्रती हप्ता या प्रमाणे  6000 रुपये प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.       

 राज्यात सद्यस्थितीत 12 लाख 91 हजार लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

 लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची  सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

 पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबी मार्फत दि. 01  ते 15 मे, 2023 या कालावधीत यासाठी गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

 
Top