धाराशिव / प्रतिनिधी-

माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे पत्रकारिता व्यवसाय करणार्‍या पत्रकार बांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने गुरूवार, 11 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांना व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातींवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर होणार्‍या आंदोलनासाठी पत्रकार बांधवांनी बहुसंख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top