धाराशिव जिल्ह्यातून शेकडो बांधवांचा सहभाग
धाराशिव / प्रतिनिधी-
अहमदनगर येथे सावता परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. अधिवेशनात माळी समाजाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या अनुषंगाने विविध ठराव संमत करण्यात आले. अधिवेशनात धाराशिव जिल्ह्यातून शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.
अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, सावता परिषदचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे तसेच धाराशिवचे भूमिपुत्र तथा प्रसिद्ध उद्योजक शंकरराव बोरकर निमंत्रक प्रदेशाध्यक्ष मयुर वैद्य, प्रदेश महासचिव गणेश दळवी, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोपाळ बुरबुरे, मुख्य संघटक संतोष राजगुरू, प्रदेश प्रवक्ते डॉ राजीव काळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनिषाताई सोनमाळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अधिवेशनात आमदार जयंतराव पाटील यांनी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिले. उपस्थित मान्यवरांनी मनोगतात समाजाच्या सद्यस्थितीविषयी भाष्य केले.
यावेळी सावता परिषदेच्या वतीने सावता महाराजांची पगडी, विळा व कांदा-मुळा-भाजी देऊन आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाला राज्यातून विविध जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.