धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव मधील शेतकऱ्यांच्या विम्याचे ३१५ कोटी रुपये रोखून धरणाऱ्या बजाज कंपनीला सुप्रीम कोर्टाने दणका दिला अाहे.  अवमानाची नोटीस बजावुन कंपनीच्या चेअरमनला   सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 3 लाख 27 हजार 287 शेतकरी पीक विम्यापासुन वंचित आहेत. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्यला शेतकऱ्यांच्या बाजूने हा दिलासा देणारा निर्णय आल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली. आमदार पाटील हे स्वतः सुनावणीसाठी दिल्लीत सुप्रीम कोर्टात हजर होते.

 देशाच्या सर्वोच्च न्यायालयात धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2020 बाबत आज सुनावणी पार पडली. आमदार ज्ञानराज चौगुले, शेतकरी अनिल जगताप यांनी याप्रकरणात याचिका दाखल केली आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पीक विम्यासाठी 7 दिवस आमरण उपोषण केले होते.  विमा कंपनीने यापूर्वी कोर्टाच्या आदेशाने २०० कोटी रुपये दिले होते मात्र उर्वरित ३१५ कोटी रुपये भरण्यास दिरंगाई करीत होते त्यामुळे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला आहे. याचिकाकर्ते प्रशांत लोमटे यांचे वकील ॲड. सुधांशू चौधरी व व राज्य सरकारच्या वतीने ॲड सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी बाजू मांडली

 सुरुवातीला पिक विमा कंपनीने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैसे देणार असल्याचे कोर्टाला सांगितले व प्रकरण परत उच्च न्यायालयात पाठवावे असे सांगितले. उच्च न्यायालयाने तीन लाख 57 हजार 287 शेतकऱ्याला पैसे देण्याची विनंती केलेली आहे त्यामुळे आणखी 348 कोटी रुपये कंपनी देणे लागत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पिक विमा कंपनीचे प्रमुख अमित अग्रवाल यांना नोटीस काढून पुढील तारखेला सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.पुढील अंतिम सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली आहे

 
Top