उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मुख्य कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना जवळ केले, त्यां दोघांच्या खांद्यावर हात टाकत हात उंचावून घोषणा दिल्या.
महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले होते. मंत्री सावंत व खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात दुरावा व अबोला होता तो आज काही अंशी दूर झाला. मंत्री सावंत व ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यात सुरुवातीला चांगले राजकीय संबंध होते. मात्र शिवसेना फुटल्यानंतर त्यांच्यात धुसफूस सुरू होती.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात भाजप आमदार राणा पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधीच्या असमतोलतेबाबत लेखी तक्रार केल्यानंतर मंत्री सावंत व अामदार राणा पाटील यांच्यात मतभेद झाले होते. त्यातच आमदार राणा यांचे कट्टर राजकीय विरोधक खासदार ओमराजे व पाटील यांच्यासोबत सावंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळीक वाढवली. त्यामुळे जिल्हयाच्या राजकारणाला आगामी काळात कशा प्रकारे वळण मिळते याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.