उस्मानाबाद / प्रतिनिधी-

औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने देण्यात आली. या सुनावणीकडे संपूर्ण मराठवाड्यासह राज्याचे लक्ष वेधले आहे.

 औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा तत्कालीन राज्य सरकारने घाईघाईत निर्णय घेतला. हरकती न मागवताच नामांतराचा निर्णय कसा घेतला गेला. त्याचबरोबर कार्यालयीन कार्यवाही झालेली नसताना नामांतर केलेल्या नावाचा वापर का केला जात आहे, असा सवाल करुन उच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती गंगापूररवाला व न्यायमूर्ती मारणे यांनी केला होता. हे प्रकरण बुधवारी न्यायालयासमोर आले असता न्यायमूर्तींनी 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.   उस्मानाबाद नामांतराविरोधात मसूद शेख (क्र.173/2022), मोहम्मद मुश्ताक अहमद चाऊस (क्र.93/2022), खलील सय्यद (क्र.110/2022) यांच्यासह इतर 19 जणांच्या याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा सतीश  तळेकर बाजू मांडत असून औरंगाबाद नामांतर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. युसुफ मुचाला हे बाजू मांडत आहेत. पुढील सुनावणी 27 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.


 
Top