उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. सरकारने 19 फेब्रुवारीपर्यंत दखल न घेतल्यास अरबी समुद्रात उडी घेऊन जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.02) जिल्हाधिकार्‍यांमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, 24 डिसेंबर 2016 रोजी  मुंबई येथे अरबी समुद्रात शिवस्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नाही. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी तमाम महाराष्ट्रासह देश-विदेशातील शिवप्रेमींची मागणी आहे. याची सुरुवात लवकरात लवकर व्हावी अन्यथा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनच्या वतीने 19 फेब्रुवारीपर्यंत अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

 निवेदनावर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र साळुंके, अध्यक्ष शशिकांत पाटील, युवकअध्यक्ष कालिदास गायकवाड, रोहित पाटील, गणेश लाड, शिवाजी भोसले, लक्ष्मण लोभे, योगेेश शिंदे,  वसुदेव पाचंगे, ज्ञानेश्वर गुळवे, आकाश पवार, राम सुरवसे, सचिन जाधव, शंकर गवळी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.


 
Top