उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 एकेकाळी मराठवाड्यात सम्राट अशोक यांची अश्मक व मुलक हे दोन जनपद होते. तर या भागातील साधु संतांनी समतेचा पुरस्कार केला. त्यामुळे मराठवाड्याला साधुसंतांची परंपरा आहे ही गोष्ट खरी आहे. तर अजिंठा लेणी हे बौद्ध धम्माच्या उत्थनाचे अविष्कार आहे असे ठाम प्रतिपादन आंबेडकरी विचार संमेलनाचे उद्घाटक व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांनी  केले.

उस्मानाबाद शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरील आर्यन फंक्शन हॉलमध्ये कळंब तालुक्यातील दहिफळ येथील स्मृतीशेष रंगनाथ एकनाथ कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत तथा सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचे सचिव दत्ता गायकवाड तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष ऍड सुदेश माळाळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. संजय कांबळे, आर.डी. सुळ, योगिराज वाघमारे, डी‌.टी. गायकवाड, सी.आर. घाडगे, ,  धोंडूबाई कांबळे, रविंद्र शिंदे, एल.आर. धावारे, पृथ्वीराज चिलवंत, युवराज नळे, भिमराव कांबळे, रमेश बोर्डेकर, अरुण गरड, दादासाहेब जेटीथोर, संजय वाघमारे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, डॉ आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून समता, बंधुता व मानवता निर्माण केली.  आंबेडकरी चळवळीच्या पायातील जी मंडळी दगड झाली. ती मंडळी त्याकाळी फारशी शिकलेली नव्हती, त्यांना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळाले व त्यांनीच चळवळ वाढविली. मात्र शिकलेल्या मंडळींनी या चळवळीस गतीरोधक बनण्याचे काम केले असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर समाजामध्ये व्यवस्थेच्या विरोधात जाणारी लाट निर्माण झाली. ही सर्व मंडळी धारिष्टवाण तर होतीच शिवाय परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्यांच्यात होती. तसेच विदर्भ व प. महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या चळवळीचे लिखाण झालेले आहे. मात्र मराठवाड्यात झाले नसल्यामुळे ते लिखाण करण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अतुल वाघमारे यांनी रेल्वेतील नोकरी सोडून निजामा विरोधात पॉम्प्लेट काढून वाटली. मात्र मराठवाडा मुक्ती संग्रामात या समाजाचा कुठेही उल्लेख केला नाही.  सध्या एकीकडे राजकारणी मंडळी स्वतःचा वट व दबाव निर्माण करण्यासाठी धडपडत असून गरिबांच्या प्रश्नाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे आंबेडकरी चळवळ फार मोठ्या आवर्तनामध्ये गेली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आर.डी सुळ यांनी स्मृतीशे रंगनाथ कांबळे यांच्या कार्याला व आठवणीला उजाळा दिला. यावेळी दत्ता गायकवाड व स्वागताध्यक्ष ऍड माळाळे यांनी आपले विचार व्यक्त केले. 

प्रास्ताविक ऍड अजित कांबळे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व आभार प्रा विक्रम कांबळे यांनी मानले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून महामानवास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण, पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top