उस्मानाबाद / प्रतिनिधी -  

2025 पर्यंत केंद्र सरकारने भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण ठरवलेले आहे. त्यात राज्यातील वीस जिल्ह्यांची निवड ही सर्वेक्षण करण्यासाठी केली आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे.  त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचे प्रमाण किती कमी झाले आहे याची पडताळणी करण्यासाठी सेंट्रल टीबी डिव्हिजनकडून सर्वेक्षणासाठी गाव आणि शहरी वार्ड मिळून असे एकूण दहा ठिकाणी प्रति दोन स्वयंसेवकांच्या टीम मार्फत ICMR, NIRT Chennai, WHO  व IAPSM GMC  लातूर या त्रयस्थ  संस्थामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

 या सर्वेक्षण दिनांक 21 डिसेंबर 2022 पासून अखंडित एक महिना चालू राहणार असून सर्वेक्षणात उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहर वार्ड क्रमांक 26 व गोपाळवाडी, तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ तू व अणदूर, लोहारा तालुक्यातील जेवळी उमरगा तालुक्यातील नलवाडी कळंब तालुक्यातील रांजणी वाशी तालुक्यातील घाटपिंपरी भूम तालुक्यातील वारे वडगाव परंडा तालुक्यातील आवड पिंपरी या दहा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

 सब नॅशनल सर्टिफिकेशन अंतर्गत सन 2015 पासून चालू वर्षातील क्षय रुग्णांचे प्रमाण औषध विक्री व प्रत्यक्ष सर्वेक्षण या निकषांतर्गत तुलनात्मक तपासणी करण्यात येणार आहे सदर सर्वेक्षणामध्ये राज्यामार्फत  कास्यपदकाच्या श्रेणीत उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांकन करण्यात आले आहे.

  प्रधानमंत्री टि.बी. मुक्त भारत अभियान  या उपक्रमांतर्गत उपचारा खालील क्षयरुग्णाला क्षयरोगावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी अतिरिक्त पोषण आहाराद्वारे सेवाभावी संस्था,   या ई-मेल आयडी द्वारे संपर्क करावा. सध्या जिल्ह्यामध्ये 1516 क्षयरुग्ण औषध उपचारावर असून त्यापैकी 12 निक्षय  मित्राद्वारे 117 क्षररुग्णांना अभियानांतर्गत अतिरिक्त मदत पुरविले जात आहे.

  सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी संबंधित वार्डाचे नगरसेवक, संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक व गावातील नागरिकांनी सहकार्य करावे व जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे

 
Top