उस्मानाबाद / प्रतिनिधी

 येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियेत 25 प्रवेश नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बुधवारी (दि.2) निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

श्री. दुधगावकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, एका बाजुला जिल्ह्यात यंदापासुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे, तर वर्षानुवर्ष सुरु असलेल्या उस्मानाबाद शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात एनसीआयएसएमने काही त्रुटी काढून यंदापासुन 48 पदवीत्तर प्रवेश क्षमता असताना ती आता केवळ 23 वर आणली आहे. यामुळे तब्बल 25 प्रवेश याठिकाणी नाकारले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यावर हा मोठा अन्याय आहे. ही प्रवेश क्षमता पुर्ववत ठेवण्यात यावी, कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक महाविद्यालयात वाढती रुग्णसंख्या, उपचारामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथील आयुर्वेद महाविद्यालयातील त्रुटींची पूर्तता करून प्रथम वर्षाची विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 
Top