तुळजापूर /प्रतिनिधी
तालुक्यात एक महिनाभर झालेल्या संततधार पावसामुळे व मंगरुळ विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८९ हजार शेतकऱ्यांच्या ६९४२८ हेक्टर शेतीत पाणी साचुन पिके बाधित झाली आहेत. तर मंगळवारी येथे ३ तासात ६८मिमि अतिवृष्टी होवुन येथे मोठे नुकसान झाले.
या नैसर्गिक आपत्तीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची तर भाकरच हिरावून घेतली आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तर ऑगस्टच्या १५ पर्यंत संततधार सुरुच आहे . तालुक्यात अतिवृष्टी व संततधार पावसाने ६९ हजार ४२८ हेक्टर मधील शेतीवरील पीक व फळ पिकांचे नुकसान झाले आहेत .
यात सर्वाधिक विक्रमी पेरणी झालेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. कांदा रोपे , मुग उडीद खरीप ज्वारी पिकांनसह फळबागांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला गेल्यावर्षी चांगला भाव मिळाल्याने सोयाबीन पेरा वाढला . मात्र , अतिपावसामुळे पिके शेतातच सडण्याच्या मार्गावर असल्याने मोठे नुकसान झाले आहे .
या पावसात अनेक घरांची पडझड झाली असुन पंधरा जनावरे यात दगावले आहेत. या नुकसान संबंधीचा अंतिम अहवाल तालुका महसूल व कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे.आता शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आशा लागली असुन सणासुदी काळात ही मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
नळदुर्ग मंडळात सर्वाधिक पर्जन्यवृष्टी !
: तुळजापूर तालुक्यात सात मंडळ असुन यात सर्वाधिक पाऊस नळदुर्ग मंडळ मध्ये 640.21मिमि(181टक्के)झाला आहे.
तुळजापूर 615.70(174%)
सलगरादिवटी 475(134%)
सावरगाव 515.60(146%)
मंगरुळ 532.50(151%)
इटकळ 467.10((132%)
जळकोट 553.50(157%)
नळदुर्ग640.60(181.1%)