उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व वित्तीय आणि सहभागी, भागिदारी संस्था, विविध शासकिय विभाग, महामंडळे आणि प्रगतीशील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यात समन्वयासाठी आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रना (आत्मा) आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फ़त जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 26 जुलै 2022 वार मंगळवार सकाळी 11.00 वाजता, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील डी.पी.डी.सी. सभागृह येथे एक दिवसीय कृतिसंगम कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. यावेळी शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, शासकीय विभागांचे विभागप्रमुख, बॅंकांचे प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आत्माचे प्रकल्प संचालक जे. पी. शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एम.डी. तिर्थकर, जिल्हा अग्रणी बॅंकचे व्यवस्थापक निलेश विजयकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक चैतन्य गोखले, कृषी उपसंचालक अभिमन्यु काशीद, RSETI व्यवस्थापक मुकेशकुमार, आत्माचे प्रकल्प संचालक बी. पी. किरवले, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, स्मार्ट प्रकल्पाचे तंत्र अधिकारी महादेव आसलकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक वैदयनाथ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
या कार्यशाळेत शेतक-यांना कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना बाबत नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक चैतन्य गोखले, प्रधानमंत्री सुक्ष्म प्रकिया उद्योग योजना PMFME योजने बाबत कृषी उपसंचालक अभिमन्यु काशीद, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प - पोक्रा योजना बाबत उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करणे योजने बाबत पुणे येथील WOTR संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक कांतीलाल गित्ते, मॅग्नेट प्रकल्प बाबत लातूर येथील MSAMB गणेश पाटील, ई-पीक पाहणी बाबत पुण्याचे जमाबंदी कार्यालयातील तहसीलदार शेवाळे, आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडील योजना बाबत माविमच्या जिल्हा समन्वयक श्रीमती शोभा कुलकर्णी, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन - ( स्मार्ट ) प्रकल्प योजना बाबत आत्मा कार्यालयाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अजित माने यांनी सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रत्येक योजनेस कोण पात्र आहेत, अर्ज कोठे आणि कसा करायचा, किती टक्के अनुदान आहे आणि या योजनांचे AIF योजनेसोबत कसे एकत्रिकरण करायचे ? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना अंतर्गत दोन कोटी रुपया पर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत आणि पतहमी अधिकतम 7 वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. तरी AIF आणि शासकीय योजनांचा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकत्रित लाभ घ्यावा, असे आवाहन सर्व अधिकारी यांनी उपस्थित शेतक-यांना केले.