उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर एकल वापर प्लास्टिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुकानदार आणि नागरिकांनी तात्काळ प्लास्टिकचा वापर बंद करून पर्यावरणाला वाचवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र प्रदूशन नियंत्रण महामंडळामार्फत एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील स्वच्छता बाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद येथील अधिकारी उपस्थित होते.श्री.दिवेगावकर यांनी नगर परिषदांच्या मुख्याधिका-यांना महाराष्ट्र प्रदूशन नियंत्रण महामंडळाच्या अधिका-यां बरोबर जिल्हयात सर्व ठिकाणी कार्यवाही करण्याचे आणि दंड वसूल करण्याचे निर्देश दिले.तसेच उपस्थित अधिका-यांना आपल्या कार्यालयात आणि बैठकांमध्ये प्लास्टिकच्या पाणीच्या बॉटल न वापरण्याबबतही सूचना दिल्या.ते म्हणाले अभ्यांगतांना जार किंवा फिल्टर पाणी काचेच्या जग आणि ग्लासमध्ये द्यावे.
उस्मानाबादेत कचरा व्यवस्थापन एक समस्येचे रूप घेत आहे.कच-याचे विलगीकरण विहीत कार्यपद्धतीत होत नाही. नाल्यांचे बीओडी लेव्हल तपासून रिपोर्ट सादर करावा , ओला कचरा आणि सुका कचरा विल्हेवाट कशाप्रकारे लावली जात आहे? आणि शहरात स्वच्छतेसाठी अधिक पाउल उचलण्याचे त्यांनी मुख्याधिक-यांना निर्देश दिले.शहरांमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी अनिधिकृत बॅनर आणि होर्डिंग लावलेले आहेत त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचेही श्री.दिवेगावकर यावेळी निर्देश दिले.