उस्मानाबाद(प्रतिनिधी) 

आज महाराष्ट्रात २०२२-२३ चा राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केला. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली, याचा फायदा राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच मराठवाड्यासह विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली,याचा फायदा देखील उस्मानाबाद जिल्ह्याला काही प्रमाणात होणार आहे.

  शेततळ्याच्या अनुदानाच्या रक्कमेत आता पन्नास टक्के वाढ करण्यात आली असून आता 75 हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे. तसेच 60 हजार कृषी पंपांना वीज देण्याची देखील घोषणा यावेळी करण्यात आली.जे छोटे पाझर तलाव आहेत त्यांचे रूपांतर साठवण तलावात करण्यासाठी देखील निधीची तरतूद झाली आहे आणि त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे त्यामुळे याचा फायदा देखील उस्मानाबाद जिल्ह्याला होईल.

  शालेय शिक्षणासाठी देखील या अर्थसंकल्पात जवळपास 2353 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रालाही या अर्थसंकल्पामुळे निश्चित पणाने फायदा होईल. शाळेच्या सोयी-सुविधांसाठी जिल्हा स्तरावर देखील पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे.लोकांसाठी झटणारे आमचे पत्रकार बांधव यांच्या पेन्शनसाठी देखील आता पन्नास कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे तर अनेक लोक मुंबई येथे कामानिमित्त जात असतात त्यांच्यासाठी ‘महाराष्ट्र भवन’ निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे. या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण,शेती,व्यवसाय या सर्व क्षेत्रांना समान न्याय देऊन राज्य अधिक गतिमान करण्याकडे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा कल दिसून आला मी या अर्थसंकल्पाचे मनःपूर्वक स्वागत करतो.

 
Top