उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याने भूकंपानंतर या कोविडच्या साथीत इतक्या मोठ्या प्रमाणावर आपले कुटुंबीय गमावले आहेत. हे पुन्हा होऊ नये यासाठी जबाबदारी ओळखा.लसीकरण करून घ्या. गर्दी टाळा. मास्क वापरा. आपले व आपल्या कुटुंबीयांचे रक्षण करा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

कोविडची तिसरी लाट येऊन धडकली आहे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा याबाबतीत तयारी करत आहे. हे संकट भीती न बाळगता गांभीर्याने घेणे गरजेचे आहे मात्र बरेच लोक निर्बंधांबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. आर्थिक चक्र वारंवार थांबणे परवडत नाही. प्रशासनाची दैनंदिन कामे मागे पडतात. सुनावण्या लांबतात. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसतो. त्यात कोरोना रात्रीच्या कर्फ्यु मध्ये झोपतो का असे टिंगल टवाळीचे सुर उमटत असतात तसे पाहता जगात सर्वत्र निर्बंध लावताना थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

पण एका मुद्द्याचा विचार करू. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मेच्या सुरवातीला एका दिवशी पिकला असताना १०००० अक्टिव रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात होते त्यापैकी ५००० लोक विविध हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स मध्ये उपचार घेत होते. जवळपास १०% लोकांना कमी अधिक प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची गरज होती. 

आता जिल्ह्यातील ८० टक्क्यांहून अधिक लोकांचे किमान एक लसीकरण पूर्ण आहे व ४५% हून अधिक रुग्णांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. आता ओमीक्रोन् विषाणू तीनपट पाचपट गतीने पसरतो आहे. असे गृहीत धरल्यास पिकमध्ये ३०००० अक्टिव रुग्ण असतील. त्यापैकी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ४% धरले तर १२०० रुग्णांना ऑक्सिजन लागेल म्हणजे जवळपास दुसऱ्या लाटेपेक्षा थोडा कमी. आयसीयुमध्ये २% रुग्ण धरले तर ६०० रुग्णांना उपचार घ्यावे लागतील. 

आता जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांची संख्या विचारात घेतली तर रुग्ण डॉक्टर प्रमाण हे व्यस्त ठरते. आज जिल्ह्यात १२०० हून अधिक ऑक्सिजन बेड, १८० व्हेंटिलेटर, त्याच्या दुप्पट आयसियु बेड, बाय पेप व इतर साधनसामग्री, ५०० हून अधिक कॉन्सनट्रेटर, ८  ऑक्सिजन प्लांट, ३ टॅंक कार्यरत आहेत. पहिल्या लाटे पेक्षा ही परिस्थिती निश्चितच चांगली आहे. पण डॉक्टरांची संख्या याप्रमाणे वाढणे शक्य नाही हे लक्षात घ्यावे लागेल.

दुसऱ्या लाटेत आपल्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी, नर्स, आरोग्य सेवकांनी एकेक जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती. त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या मृत्युदरात मोठी घट झाली. ऑक्सिजनचा एकेक टँकर आणण्यासाठी महसूल यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. रुग्णांना औषधे, जेवण, रुग्णवाहीका अशा बाबतीत यंत्रणा , सामाजिक संस्था मदत करत होत्या. पोलिस विभागाने लॉकडाऊन नियमन करण्यात मोठी भूमिका बजावली. वाचणाऱ्या जीवांकडे पाहून समाधान वाटते मात्र आपल्याला सोडून गेलेल्या मित्र, कुटुंबीयांचे दुःख कधीही भरून निघत नाही मग अशावेळी संसर्गाची गती कमी करणे आणि लसीकरण पूर्ण करणे हे दोनच पर्याय प्रशासनासमोर उरतात. त्यामुळे विनाकारण गर्दी करणाऱ्या बाबी टाळणे आणि निर्बंध घालणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

 
Top