उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महागाईच्या नावाखाली केंद्र सरकारवर सातत्याने खडे फोडणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आघाडी सरकार भाजपा शासित इतर राज्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेलसाठी किती जास्त दर आकारत आहे.यावरूनच त्यांच्यातील जनतेविषयीचे प्रेम सिद्ध होते. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी दरवाढ कमी करा, अशी मागणी भााजप अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्य शासनाकडे केली अाहे.

भाजपा शासित राज्यांपैकी उत्तरप्रदेश मध्ये डिझेल ८६.७६ रुपये तर पेट्रोल ९५.२४ रूपये, गोव्यामध्ये डिझेल ८७.२७ रुपये तर पेट्रोल ९६.३८ रूपये गुजरातमध्ये डिझेल ८९.१२ रुपये तर पेट्रोल ९५.१३ रुपये आहे. तर महाविकास आघाडी सरकार शासित महाराष्ट्रात डिझेल ९३.५९ तर पेट्रोल ११०.४६ रुपये दराने विकले जाते. अाैरंगाबादेत केंद्र सरकार विरोधात महागाईबाबत मोर्चा काढण्यात आला. मात्र इंधनदरात काहीही कपात न करता राज्यातील नागरिकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या शिवसेनेला महागाईबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का, असा सवाल करून अामदार पाटील यांनी म्हटले अाहे की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन केले. परंतु केंद्र सरकारने इंधन कर कमी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ बैठक होऊन देखील रुपयाही कमी करायला तयार नाही. मग ही आंदोलने केवळ नौटंकीच होती का, असा प्रश्न उपस्थित होतो. सर्वंकष विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात क्रमश: रु.५ व रु.१० प्रमाणे कपात केली आहे. राज्य सरकारला इंधन कराचा केंद्राइतकाच हिस्सा मिळत असल्याने राज्य सरकार आपल्या करात कपात करेल व हा निर्णय गत आठवड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल ही अपेक्षा होती. परंतु तसे काहीच झाले नाही. देशातील ५ पेक्षा जास्त राज्यांनी कर कमी केला, मग महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला हे का जमत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. ‘कोविड मुळे निधी नाही’ हे राज्य सरकारचे नेहमीचे म्हणणे देखील या विषयात लागू होत नाही. कारण इंधन विक्रीतून उपलब्ध होणारे वार्षिक उत्पन्न कोविड आधीच्या वर्षांपेक्षा ३० टक्क्यांनी वाढले आहे, ही अधिकृत आकडेवारी सांगते. छोट्या राज्यांनी देखील व्हॅटही कमी केला आहे. येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत दर न केल्यास आंदोलनाचा इशाराही अामदार पाटील यांनी दिला अाहे.


 
Top