निराधार, दिव्यांग, वैद्यकीय, शिक्षण आणि इतर कोणत्याही अडचणी असतील तर तात्काळ संपर्क करा त्याची सोडवणूक केली जाईल असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील यांनी केले.ते अनदुर येथे शिव संपर्क अभियान निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते
व्यासपीठावर युवा सेनेचे राज्य विस्तारक अविनाश खोपे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय कुमार सस्ते, जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्यामल वडणे, शिवसेनेचे माजी उस्मानाबाद शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, शिवसेनेचे तुळजापूर तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, तुळजापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचा एकही पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेचा सदस्य नाही त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामाचे सोडवणूक होत नाही, त्यामुळे त्याची चिंता न करता कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क करावा. उज्वला गॅस योजना अंतर्गत केंद्र शासनाकडून सर्वसामान्यांची फसवणूक झाली असून महागाईने कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारकडून आतापर्यंत कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.