उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या काही दिवसात झालेल्या अतीवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप पिकाचे व ऊसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्राथमिक अंदाजाप्रमाणे ७० टक्के क्षेत्रावरील सोयाबीन तसेच अन्य पिकांचे व उसाचे क्षेत्र बाधीत झाले आहे. याची व्याप्ती लक्षात घेवून शेतकऱ्यांना दसऱ्याच्या अगोदर अनुदान व पिक विमा द्यावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्राद्वारे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे. त्यांचे पत्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी भुसे यांना दिले.

आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, तुळजापूर येथे आढावा बैठक ठेवली होती. परंतू, ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. लातूरहून सोलापूरला जाताना उस्मानाबाद जिल्ह्यात पाहणी करूण जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र आढावा बैठक घेतली असती तर नुकसानीची तीव्रता व विषयाचे गांर्भीय समजले असते. शेतकऱ्यांना देखील थोडा फार दिलासा वाटला असता. कोरोना प्रादुर्भार्वामुळे अभूतपूर्व अडचणीत असलेली अर्थ व्यवस्था व त्यात बळीराजावर झालेला हा मोठा आघात लक्षात घेता शासनाकडून तातडीनेउपाययोजना राबविण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. पत्रात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ३३ टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधीत झालेले आहे. पिकांना हेक्टरी ६८००, १३ हजार ५०० मदत करणे अनुज्ञेय आहे. मदत शेतकऱ्यांना विना विलंब मिळावी यासाठी कालबध्द कृती आराखडा करण्यात यावा. त्याच्या अंमलबजावणी बाबत संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात याव्यात. सर्वसाधारण पिक विम्याची नुकसान भरपाई देण्यासाठीच्या प्रचलीत पध्दतीनुसार खरीप पिकांचे कापणी प्रयोग सुरु आहेत. अनेक शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जे की प्रात्यक्षीक पीक कापनी प्रयोगाच्या कार्यपध्दतीनुसार लक्षात येणे शक्य नाही. अशा शेतकऱ्यांवर अन्याय होवू नये म्हणून त्यांना वैयक्तीक अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अँपवर अर्ज केलेले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ नुकसान भरपाई मिळावी, अहवाल देण्यासाठी काल मर्यादा ठरवावी, अशी मागणी पत्रात केली आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. अनिल काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, प्रभाकर मुळे, विजय शिंगाडे, जिल्हा मजुर फेडरेशनचे माजी अध्यक्ष नारायण नन्नवरे, पंचायम समिती उपसभापती शिवाजी गोरे, अनिल बंडगर, नानासाहेब डोंगरे, सुहास साळुंके, सुशांत भुमकर, गिरीष देवळाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top