उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासोबतच महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करुन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंबाला आधार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी /वाणेवाडी येथील शेतकरी लामतुरे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या शेती शाळेस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी भेट देऊन तेथील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मंगरूळकर, कृषी उपसंचालक काशीद,  कृषी विकास अधिकारी चिमणशेटे, उपविभागीय कृषी अधिकारी कोळेकर, सुमित सोनटक्के , तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व  हिंगळजवाडी /वाणेवाडीचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी  शेतकऱ्यांनी पेरणीकरण्यापुर्वी  कृषि विभागाने केलेल्या आव्हानानुसार  बियाण्याची उगवण क्षमता तपासुन व योग्य ती बिजप्रकीया करुनच पेरणी करावी असे आवाहन  केले. तसेच  शेतकरी महिलांना फळबाग लागवड व शेतीमध्ये  आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेती करणेकरीता मार्गदर्शन केले.
 जिल्ह्यातील महिलांनी  शेती पूरक व्यवसाय करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे  व आपल्या कुटुंबाला आधार द्यावा असे आवाहन श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.  भेटीदरम्यान बी.बी.एफ. यंत्राव्दारे पेरणीचे प्रात्यक्षिक ही  घेण्यात आले.
  शेतीशाळे दरम्यान श्री.चिमणशेटे यांनी  किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत उपस्थित महिला शेतकरी यांना मार्गदर्शन केले. श्री.मंगरुळकर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतीशाळा संकल्पने बाबत मार्गदर्शन करुन येत्या खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या शेतीशाळा नियोजना बाबत माहिती दिली . शेतीशाळेमध्ये निंबोळी अर्क तयार करणे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
 
Top