उस्मानाबाद /प्रतिनिधी-
भारत सरकारच्या महत्वाकांक्षी  स्टँड अप इंडिया  योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी पुणे स्टेशनजवळ अल्पबचत सांस्कृतिक भवन मध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत "स्वावलंबन संकल्प अभियान" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सिडबी, एस. सी. एस. टी. हब आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) यांच्या वतीने देशात ठिकठिकाणी 30 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्टँड अप इंडिया  योजनेच्या माध्यमातून देशात अनुसूचित जाती - जमाती मधून एक लाख पंचवीस हजार नवीन उद्योजक निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. पैकी मागील तीन वर्षात वीस हजार उद्योजक निर्माण झाले आहेत. बँकांनी तीन हजार कोटीहून अधिक रुपयांचे विना तारण कर्ज लाभाथ्र्याना दिले आहे. या योजनेची मुदत 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या काळात देशात एक लाखापेक्षा अधिक उद्योजक निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सिडबी, एसी एसटी हब, सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी उद्योजकांच्या साहाय्याने डिक्कीने कार्य योजना बनवली आहे. ती होतकरू लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी देशव्यापी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात व्यवसायांच्या विविध संधी, सरकारचे विविध सार्वजनिक उपक्रम याबद्दल मार्गदर्शन होणार आहे. दरम्यान डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे हे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डिक्कीचे मराठवाडा अध्यक्ष प्रफुल्ल पंडित आणि उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शीतलकुमार शिंदे यांनी केले आहे.

 
Top