वाशी (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य मानत वाशी पोलीस ठाण्याने शालेय वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. “सुरक्षित विद्यार्थी  सुरक्षित प्रवास  सुरक्षित भविष्य“ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी विशेष वाहतूक सुरक्षा मोहीम हाती घेण्यात आली असून, शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो-रिक्षा, शालेय बस, व्हॅन आणि इतर वाहनांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिला आहे.

शाळा सुरू होताच सकाळी व दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. काही वाहनचालकांकडून निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहनांची योग्य देखभाल न करणे, चालकांकडे आवश्यक परवाने व कागदपत्रे नसणे, वाहनांची फिटनेस मुदत संपलेली असणे, तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत. अशा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाशी पोलिसांनी ही विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची नियमित तपासणी केली जाणार आहे. वाहनांची फिटनेस, विमा, परमिट, प्रदूषण प्रमाणपत्र, चालकाचा वैध परवाना, वाहनातील सुरक्षाविषयक सुविधा, आपत्कालीन व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पडताळणी केली जाणार आहे. कोणतेही वाहन नियमबाह्य आढळल्यास संबंधित चालक व वाहनमालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. वाहनामध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवू नयेत, वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाहनात चढविणे व उतरविणे याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच शाळेच्या परिसरात अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहनांची सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे व वाहनांची नियमित देखभाल करणे बंधनकारक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

याबरोबरच शाळा व्यवस्थापन व पालकांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे वाशी पोलिसांनी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी केवळ अधिकृत, सुरक्षित आणि नियमांचे पालन करणाऱ्या वाहनांची निवड करावी. शालेय वाहनांची वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. नियमांचे उल्लंघन करणारे वाहन किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणारे चालक आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस ठाणे वाशी येथे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी नसून पालक, शाळा व्यवस्थापन, वाहनचालक आणि समाजातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अपघातमुक्त प्रवासाची हमी देण्यासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणालाही कायद्यापासून सूट दिली जाणार नाही, असा ठाम इशारा पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिला आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून स्वागत होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला सर्वांनी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 
Top