तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी हे हिंगोलीहून कोल्हापूरकडे जात असताना सोमवारी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे थांबले. यावेळी विविध संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी शेट्टी यांचे उत्स्फूर्त व भव्य स्वागत केले.
तुळजापूर येथे झालेल्या या भेटीदरम्यान राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, संघटनेची आगामी भूमिका तसेच शेतकरी प्रश्नांवर करण्यात येणाऱ्या आंदोलनांबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न राजू शेट्टी यांच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष तानाजी पेंदे, तालुकाध्यक्ष दुर्वास भोजने, राजेंद्र हाके, सतीश पांडे, प्रवीण कदम यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
