तुळजापूर (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानीच्या पावन भूमीत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मनोहर पाटील यांनी पदभार स्वीकारला असला, तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा अक्षरशः डोंगर उभा आहे. मागील काही वर्षांत घडलेल्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची प्रतिमा, कायदा-सुव्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांसमोर केवळ प्रशासन चालविण्याचे नव्हे, तर तुळजापूर उपविभागाविषयी जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे.
तुळजापूर हे केवळ शहर नसून महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारो, तर उत्सव काळात लाखो भाविक राज्यासह देश-विदेशातून येथे येतात. अशा तीर्थक्षेत्रात कायदा-सुव्यवस्थेबाबत निर्माण झालेली नकारात्मक चर्चा ही संपूर्ण तुळजापूरच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरते. मागील कार्यकाळात उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणामुळे तुळजापूरचे नाव राज्यभर गाजले. या प्रकरणामुळे भाविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि तीर्थक्षेत्राची प्रतिमा मलिन झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त झाली. या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी त्यानंतर पोलीस कारभाराबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाल्या. याच काळात गावठी कट्टे, अवैध धंदे आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे. युवकांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती, खून, मारामाऱ्या आणि शस्त्रांचा वापर यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असल्याची भावना आहे.
'पोलीस मित्र आहेत' ही भावना निर्माण करण्याची गरज
एकेकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात जाणे म्हणजे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत असे. मात्र बदलत्या काळात पोलीस आणि जनतेतील विश्वासाचे नाते अधिक दृढ होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेणारी, पारदर्शक आणि संवेदनशील पोलीस यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
भाविकांची सुरक्षा प्रथम
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित वातावरण मिळणे ही पोलीस प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. मंदिर परिसर, शहरातील वाहतूक, पार्किंग, चोरी, फसवणूक, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही नव्या अधिकाऱ्यांसमोरची प्राथमिक जबाबदारी असेल. नवीन डीवायएसपींच्या स्वागतासाठी रांगा लागल्या असून, जनतेच्या अपेक्षांचे ओझेही त्यामुळे वाढले आहे.