धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा,परिमंडळ लातूर रेखा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 1 जुलै रोजी जिल्हास्तरीय आरोग्य आढावा बैठक उत्साहात पार पडली.बैठकीत आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत नागरिकांना दर्जेदार,तत्पर आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, जिल्हास्तरीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,कार्यक्रम समन्वयक तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

आगामी श्री आषाढी वारी पंढरपूर पालखी सोहळा लक्षात घेऊन यात्रेदरम्यान आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारीबाबत चर्चा झाली. औषधसाठा,वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व्यवस्था,स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी उपसंचालक रेखा गायकवाड यांनी सर्व आरोग्य संस्थांनी शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना गुणवत्तापूर्ण,पारदर्शक आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्याचे निर्देश दिले. सहाय्यक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय ढगे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू,मलेरिया,अतिसार आणि ताप यांसारख्या साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणेने विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकारी यांनी विविध आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा सादर करत सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयातून शासनाने दिलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला. बैठकीदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांशी विविध आरोग्य योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले.


 
Top