मुरुम (प्रतिनिधी)- येथील महात्मा गांधी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुलकर्णी यांचा मंगळवारी (ता. 30) रोजी सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होताना कुलकर्णी यांनी मांडलेला जीवनाचा लेखाजोखा उपस्थितांना भावूक करणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्रीमंत भुरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू पाटील, संगमेश्वर घाळे, बाबासाहेब डांगे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दत्तात्रय कुलकर्णी व सौ. सुचिता कुलकर्णी यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय कुलकर्णी म्हणाले की, शैक्षणिक प्रवासात मिळालेले प्रेम आणि सहकाऱ्यांची साथ हीच माझ्या आयुष्याची खरी पुंजी आहे. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संजय कोथळीकर आणि लक्ष्मण देवकर यांनी आपल्या मनोगतातून कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोप करताना श्रीमंत भुरे यांनी कुलकर्णी यांच्या निष्ठावान सेवेचा गौरव केला. याप्रसंगी सरपंच पूजाताई पटवारी, ग्रामविकास अधिकारी गंगाराम इंगळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कोरे, तुळजापूर पं. स. च्या उपसभापती रोहिणी निलगिरे, उद्योजक भीमसिंग राजपूत, फारुक शेख, आण्णा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय बणजगोळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश भुरे तर आभार योगेश कोडलंगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकेश बिराजदार, अँड. एस. पी. इनामदार व विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सेवानिवृत्तीनंतरच्या पुढील वाटचालीस सर्वांनी कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या.
