धाराशिव (प्रतिनिधी)- पाडोळी (आ.) ते बोरखेडा प्र. जि. मा. क्र. 34 व पाडोळी (आ.) ते बोरगाव राजे इजिमा क्र. 66 या महत्त्वाच्या मार्गांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिक, शेतकरी व उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक ॲड.व्यंकट गुंड पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाडोळी (आ.) ते बोरखेडा प्र. जि. मा. क्र. 34 हा मार्ग परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गाचे काम तातडीने हाती घेतल्यास पाडोळी, बेंबळी, कनगरा व परिसरातील गावांमधील अंतर कमी होऊन दळणवळण अधिक सुलभ होईल. तसेच पाडोळी परिसरातील सुमारे 40 टक्के शेतकऱ्यांच्या शेतीजमिनी या मार्गालगत असून शेतकरी व नोकरदार वर्गाचा मोठ्या प्रमाणात या मार्गावर वावर असतो. पाडोळी साठवण तलाव तसेच रुपामाता नॅचरल शुगर कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूकही याच मार्गाने होत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
तसेच पाडोळी (आ.) ते बोरगाव राजे इजिमा क्र. 66 या मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे काम अपूर्ण राहिले आहे. संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ॲड.गुंड पाटील यांनी केली आहे. याशिवाय रस्त्यालगतच्या पाण्याच्या नाल्यांची स्वच्छता करून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही याची व्यवस्था करावी, तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून वळणावरील दृश्यमानता वाढवावी, जेणेकरून अपघातांना आळा बसेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर दोन्ही मार्गांबाबत संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ॲड व्यंकट गुंड पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांनाही देण्यात आल्या आहेत.