धाराशिव (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत,निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.निवडणुकीदरम्यान वाहनांच्या गैरवापरास प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये आदेश जारी केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने 18 मे 2026 रोजी उस्मानाबाद -लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,त्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या ताफ्यांवर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत मोटारगाड्या,वाहने किंवा मोटारसायकलींच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने असू नयेत,असे निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार आता कोणत्याही वाहन ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटारगाड्या, मोटारसायकली अथवा अन्य वाहने वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यासह लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये हे आदेश लागू राहणार असून,आदेश निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ते 25 जून 2026 पर्यंत अंमलात राहतील.सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने सार्वजनिक हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश 18 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जारी केला आहे.