मुरुम (प्रतिनिधी)- सामान्य कुटुंबातील मुलगा शिकायचा असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा. पोरांनो, मोर्चे, आंदोलन व दंगलीच्या भानगडींमध्ये पडू नका. आज प्रत्येक कामामध्ये पोलीस पडताळणी आवश्यक आहे. अशा दंगलीमध्ये तुम्ही दिसलात तर 10 वर्षांची शिक्षा होईल. मुलांसह युवक मोबाईलच्या व्यसनात अडकले आहेत. शाळेतील पोरं रम्मी खेळून भिकारी झाली आहेत. संभाजी महाराजाची जयंती म्हणून शाळेत शैक्षणिक कालावधीत शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय प्रत्येक गावाने घेतला तरच शाळा सुधारेल असे मत हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले.
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व अधिकमास निमित्ताने शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील दाळींब येथे बुधवारी (दि.13) समाज प्रबोधनकार, महाराष्ट्रभूषण ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता समितीचे विधानसभा सह-अध्यक्ष शरण बसवराज पाटील, जिप सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, अमर वाले, नगरसेवक राजु मुल्ला, सादिक चाकुरे आदी उपस्थित होते. किर्तणसेवेत पुढे हभप इंदोरीकर म्हणाले की, चुकीच्या मार्गाने पैसा, सोने, गाड्या, संपत्ती कमवाल पण त्यामध्ये जीवनातील समाधान मिळणार नाही. बाप स्वतःच्या पायात चप्पल न चालता, फाटके बनीयन वापरतो, डोक्याला व भाजीला तेल नसले तरी मुलांच्या शिक्षणासाठी आई अहोरात्र काबाडकष्ट करते. आई वडिलांची व संतांची सेवा केली तरच देव भेटतो. शेतकऱ्यांनी पुरक उद्योग करणे गरजेचे आहे. महिला वेळेवर जेवण करत नसल्याने त्यांच्यात आजाराचे प्रमाण वाढले आहे. दारुडयाला मुलगी देणे म्हणजे कसायाला गाय देण्यासारख आहे. निर्व्यसनी मुलगा हीच खरी संपत्ती आहे. जो शेती करतो त्यांनाच शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. शरीरात प्राण आहे तोपर्यंत सर्व सुख समाधानी रहा. असलेल्या साधन संपत्तीचा जीवनात उपभोग कधी घेणार आहात ? माणवाच्या अंगातील ताकत आणि खिशातला पैसा संपला की समाजातील किंमत संपली. फक्त किर्तण ऐकुन उपयोग नाही किर्तणामुळे समाजात बदल होण गरजेच आहे. ज्ञान आले की दुःख येत नाही. चुकीचे निर्णय दुःखाला कारणीभूत आहे. दोन मिनिटांच्या रागातील कर्माचे फळ आयुष्यभर भोगावे लागते. लहान बाळाला मोबाईल देऊन आई-वडिलांनी बिघडवले आहे. प्रत्येकाने किमान 5 तास मोबाईल पासुन दुर रहाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
