धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार 9 मे 2026 रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.धाराशिव मुख्यालय येथे सकाळी ठिक 10.30 वाजता लोकअदालतीच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.यावेळी श्रीमती अभिश्री देव,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,श्री.एस.जी.ठुबे,जिल्हा न्यायाधीश-3,श्री.आर.के. खोमणे,जिल्हा न्यायाधीश-4, भाग्यश्री पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तसेच इतर न्यायाधीश यांच्या उपस्थितीत लोकअदालतींची सुरुवात झाली.या लोकअदालतीसाठी एकूण 9 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती.
9 मे रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लोकअदालतीमध्ये प्रलंबित एकूण 7,045 तर दावापूर्व प्रलंबित 9,309 अशी एकूण हजारो प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित 291 आणि दावापूर्व 2,428 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीमध्ये विविध प्रकारच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात आली.धनादेश प्रकरणांमध्ये फिर्यादी पक्षाला तब्बल रुपये 1 कोटी 19 लक्ष 49 हजार 84 हजार इतकी रक्कम प्राप्त झाली.प्रलंबित मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणांत रुपये 1 कोटी 74 लक्ष 5 हजार इतकी भरपाई देण्यात आली.तसेच प्रलंबित दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांत 1 कोटी 68 लक्ष 86 हजार 526 रुपये रकमेचा निपटारा करण्यात आला.
याशिवाय बँकांच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये रुपये 28 लक्ष 92 हजार 767 रुपये तर बँकांच्या वादपूर्व प्रकरणांमध्ये रुपये 47 लक्ष 24 हजार 89 रुपये इतकी वसुली करण्यात आली.नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी व घरपट्टी प्रकरणांमध्ये रुपये 95 लक्ष 20 हजार 792 रुपये रकमेची वसुली झाली.विद्युत वितरण प्रकरणांमध्ये रुपये 14 लक्ष 99 हजार 235 रुपये तर ग्राहक मंचाच्या प्रकरणांमध्ये रुपये 15 लक्ष रुपये रकमेचा निपटारा करण्यात आला.तसेच गुन्हा कबुलीच्या प्रकरणांमध्ये 86 हजार 500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. राष्ट्रीय लोकअदालतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद,सुलभ आणि कमी खर्चात न्याय मिळण्यास मोठी मदत होत असून,सामोपचाराने वाद मिटविण्याच्या प्रक्रियेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.