धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील पशुपालन,शेळी- मेंढीपालन,कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ मोहीम राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी (खेळते भांडवल) आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही,त्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाणार आहे.दूध संस्थेने हमी दिल्यास ही मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवता येते.तसेच,ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे,त्यांनाही 3 लाखांपर्यंतची पतमर्यादा वाढवून घेता येईल. कर्जाचा मूळ व्याजदर 9 टक्के असला तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 3 टक्के आणि राज्य शासनाच्या 11 फेब्रुवारी 2026 च्या निर्णयानुसार 4 टक्के अशी एकूण 7 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळू शकते.बँकांनाही यात 2 टक्के व्याज सवलत देण्यात आली आहे.त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालक व शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शून्य टक्के व्याजदराचाही लाभ घेता येण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
सन 2026-27 पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (राज्य व जिल्हास्तर) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या क्रेडिट कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ घेता येणार आहे.राज्यातील 10 लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात अथवा 1962 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जे पशुपालक दूध सोसायटी,दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद आहेत व ज्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही,असे सर्व शेतकरी या मोहिमेसाठी पात्र आहेत.‘पशुसंवर्धन उपआयुक्त’ हे या योजनेचे सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत असून,सध्या पशुपालन करणाऱ्या व या योजनेपासून वंचित राहिलेल्या पात्र पशुपालकांना लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.
पात्रता : प्रकल्प धारकाने केंद्र/राज्य शासन/जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा. पशुपालन प्रकल्पांमधील सर्व पशुधनाची एनडीएलएम (भारत पशुधन) पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे.
व्याज परतावा सवलत पुढीलप्रमाणे. कमाल पशुधन संख्या असलेल्या पशुपालकांनाच अनुज्ञेय राहील:
25,000 मांसल कुक्कुट पक्षी / 50,000 किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी.45,000 किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या हॅचरी युनिट.100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा. 500 किंवा त्यापेक्षा कमी मेंढी/शेळी गोठा.200 किंवा त्यापेक्षा कमी वराह. पशुपालकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत करणे आवश्यक राहील. योजनेच्या निकषांनुसार तसेच वेळोवेळी होणाऱ्या बदलांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करणे लाभार्थ्यांस बंधनकारक राहील.या उपक्रमामुळे पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील पशुधन व्यवसायाला चालना मिळणार आहे.