धाराशिव (प्रतिनिधी)- अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले आहे.तीन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीच्या तडाख्यातून सावरायच्या आतच काल झालेल्या पावसाने तुळजापूर, लोहारा यासह अनेक भागांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः केळी, द्राक्ष आणि आंब्याच्या मोहोराचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.काही ठिकाणी पिके उद्ध्वस्त झाली असून,शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आहेत.यामुळे शेतकरी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांकडे व प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
दरम्यान,हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची धास्ती आणखी वाढली आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्याशी सलग तीन दिवस संपर्क ठेवला आहे.
आजही पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कोकणात ज्या पद्धतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच धर्तीवर पारदर्शक आणि अचूक पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी पुजार यांना दिले आहेत.
