धाराशिव (प्रतिनिधी)- येथील डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयातील प्रथम व तृतीय वर्षाच्या विधी विद्यार्थ्यांनी महावितरणच्या संरक्षण व सुरक्षा मंडळ कार्यालय, धाराशिव येथील वीज तक्रार निवारण मंच (सीजीआरएफ) विभागास शैक्षणिक भेट दिली.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता व वीज तक्रार निवारण मंचाच्या सचिव नीलांबरी कुलकर्णी तसेच स्वतंत्र सदस्य मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नीलांबरी कुलकर्णी यांनी वीज कायद्यातील बदल, स्मार्ट मीटरची अंमलबजावणी तसेच वीज चोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तर मेधा कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करताना ग्राहकांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच वीज तक्रार निवारण मंचाचे कार्य स्पष्ट केले. या मंचाद्वारे ग्राहकांना तक्रार नोंदवून त्याचे निवारण कसे केले जाते, याची प्रात्यक्षिक उदाहरणांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्मार्ट मीटर व वीज चोरीसंदर्भात विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. ही भेट प्रा. डॉ. पूनम दागडिया/तापडिया यांच्या समन्वयातून पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य कायला कृष्णमूर्ती यांनी मार्गदर्शन केले. या भेटीस मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
