धाराशिव (प्रतिनिधी) - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची चौकशी पारदर्शक पद्धतीने करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कळंब-धाराशिव विधानसभा अध्यक्ष मोहन वसंतराव मुंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१० मार्चपासून उपोषणास  बसणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.९ मार्च रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले आहे. ते महाराष्ट्राचे एक बुलंद उपमुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करीत होते. त्यांचा बारामती विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बाब ही अत्यंत संशयास्पद असून त्यांच्या मृत्यूबाबत अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच त्यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी व्हीएसआय कंपनीच्या निष्काळजी कृत्यामुळे आणि या घटनेबाबत घातपात असल्याची शंका घेणे योग्य असून प्रशासन व पोलीस अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. वास्तविक, पाहता पवार हे घटने दिवशी ज्या विमानतळावरून निघाले तेथून जेथून विमानतळावर पोहोचले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे. मात्र, ते न दिल्यामुळे घातपात झाल्याचा संशय बळावत असून पोलीस प्रशासन ते फुटेज का देत नाही किंवा प्रसिद्ध करत नाही. तसेच निष्काळजीपणा का झाला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार यांनी जनतेला देणे आवश्यक आहे. पवार हे धाराशिव जिल्ह्याचे लाडके जावई होते. त्यांनी धाराशिव जिल्ह्याचे विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे पवार यांना न्याय मिळावा.  त्यांचा घातपात झाला ही ९५ टक्के जनता म्हणत आहे. त्याचे गांभीर्य घेऊन आम्हाला व आमच्या नेत्याला न्याय देण्यात यावा. यासाठी सीआयडी चौकशी समिती नेमावी व योग्य दिशेने चौकशी करावी. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा घटना घडत असतील तर सर्वपक्षीय आमदार खासदार व मंत्री यांचे कसे होणार असा प्रश्नही त्यांनीं उपस्थित केला आहे. पवार यांच्या घटने दिवशी ते घरातून निघाल्यापासून विमानतळावर पोहोचेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज  देण्यात यावेत. पोलीस प्रशासनाने संबंधित घटनेची चौकशी पारदर्शकपणे करावी. याप्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा का नोंद केला नाही ? त्याची चौकशी सविस्तर व्हावी. तसेच त्यांच्या घातपाती मृत्यूची चौकशी ही पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी हे उपोषणाला करणार आहेत. जर योग्य दिशेने तपास नाही केल्यास दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई येथील मंत्रालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मुंडे यांनी दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव शहर युवक अध्यक्ष संदीप बनसोडे व नागराज साबळे यांच्या सह्या आहेत.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top